उपविभागाविषयी
प्रशासकीय माहिती –
कणकवली उपविभागाची निमिर्ती ही प्रशासकीय दृष्टया सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे निर्मितीपासून दिनांक १ मे १९८१ पासून झाली.
उपविभागीय अधिकारी यांची प्रथम नियुक्ती ही १ जुलै १९८२ पासून झाली. कणकवली उपविभागाचे निर्मितीचे वेळी कणकवली उपविभागात एकूण चार तालुके होते. त्यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण या तालुक्यांचा समावेश होता.
उपविभाग पुर्नरचनेमध्ये यापैकी मालवण तालुका वगळला जावून आज रोजी कणकवली उपविभागात कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यांचा समावेश आहे.
कणकवली उपविभागाचे मुख्यालय हे कणकवली शहर येथे आहे. जे भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी असून कोकण रेल्वे आणि मुंबई – गोवा हायवेव्दारे उत्तम प्रकारे जोडले गेलेले आहेत.
भौगोलिक स्थिती –
कणकवली उपविभाग हा सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांचे दरम्यान पसरलेला आहे.
कणकवली तालुका – १६.३१४८ N अक्षांश , ७३.७००७६-रेखांश
देवगड तालुका – १६.३७५९ N अक्षांश , ७३.३८८५ – रेखांश
वैभववाडी तालुका – १६.४९६८ N अक्षांश , ७३.७४६३ – रेखांश
कणकवली उपविभागात अरुणा, वाघोटण, जानवली, गड, देवगड पियाळी, शुक नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
तर सह्याद्री पर्वतरांगा फोंडा, करुळ व भुईबावडा यासारखे घाटमार्ग आहेत.
समुद्रकिना-यालगत विजयदुर्ग, देवगड यासारखे किल्ले आहेत.
कणकवली तालुका –
कणकवली तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचा आणि प्राचीन इतिहास लाभलेला भाग आहे. पश्चिम कोकणातील या भागाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास समृध्द आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
प्राचीन काळापासून लोकवस्तीचा आणि व्यापाराचा केंद्र बिंदू असलेल्या याच शहराचा उल्लेख सातवाहन आणि चालुक्य राजवटीत आढळतो.
मध्ययुगात शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कणकवली हे सैन्य हालचालींसाठी आणि सागरी किल्ल्यांचे संरक्षणासाठी एक धोरणात्मक ठिकाण होते.
ब्रिटीश राजवटीत कणकवली महल हा मालवण तालुक्याचा भाग होता.
स्वातंत्र्योत्तर काळात महाल रचनेचे तालुका व मंडळ प्रणालीत रुपांतर झाले.
वैभववाडी तालुका –
वैभववाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपन्न, डोंगराळआणि ऐतिहासिक तालुका असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा भाग प्राचीन काळापासून व्यापारी, धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा भाग आहे.
वैभववाडीचा इतिहास प्राचीन काळी सातवाहन, चालुक्य व शिलाहार राजवटीपर्यंत पोहोचतो.
करुळ घाट भुईबावडा घाट हे घाटमार्ग पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.
वैभववाडी हा पूर्वी कोल्हापूर संस्थानचा भाग होता. वैभववाडी हा जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्वाचा तालुका असला तरी त्यांच्या इतिहासावर कोल्हापूरच्या प्रभावाची गडद छाप आहे.
देवगड तालुका-
देवगड तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरेबियन/अरबी समुद्रालगत वसलेला कोकण किनारपट्टीवरील एक निसर्ग संपन्न ऐतिहासिक तालुका होय.
देवगडचा इतिहास हा प्राचीन काळापासून सातवाहन, चालक्य, शिलाहार या राजवटीच्या अधिपत्याखाली आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोकण किनारपट्टीवरील सागरी संरक्षणाखाली किल्ले निमिर्ती व किल्ले डागडुजी आढळून येते. देवगड किल्ला निमिर्ती विजयदुर्ग किल्ला डागडुजी ही त्याची उदाहरणे होत.
देवगड हापूस आंबा हे येथील प्रमुख व जागतिक ख्यातीचा GI-TAGGED (भौगोलिक मानांकन प्राप्त) उत्पादन आहे.



